Legends- Marathi theatre





बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर

जन्म : ३१/३/१८४३ मृत्यु : २/११/१८८५

अण्णासाहेबांचा जन्म दि. ३१/३/१८४३ रोजी कर्नाटकातील गुर्लहोस्सूर येथे झाला. मराठी, कानडी व इंग्रजी शिक्षण घेऊन ते पुण्याला आले. पुण्यात एक नाटक मंडळी काढून ती लवकरच बंद पडली. पुढे बेळगावला शिक्षकची नोकरी धरली. त्यानंतरही पुढे पोलिस खात्यात नोकरी केली. त्यांनी १८८० साली एक पारशी नाटक पाहिले. हे नाटक ‘ड्रॅमॅटिक ऑपेरा’ या प्रकारातले होते. या नाटकाचा त्यांच्यावर फारच प्रभाव पडला. यातूनच त्यांना कालिदासाच्या ‘अभिजात शाकुंतल’ या नाटकाचे रुपांतर करावे व त्याचा प्रयोग करावा असे वाटले. पहिल्या चार अंकांचे भाषांतर १८८० च्या ऑगस्टमध्ये पूर्ण केले व दि. ३१ ऑक्टोबर १८८० साली अश्विन महिन्यातील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्यातील ‘आनंदोद्भव’ या नाट्यगृहात ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. या नाटकात एकूण १८३ पदे आहेत.

पनवेल येथील गुळवे या सावकारांनी अण्णासाहेबांना नाटकासाठी आर्थिक सहाय्य केले.

आण्णासाहेबांचे दुसरे नाटक ‘सौभद्र’ या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यामध्ये दि. १८ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. मराठी रंगभूमीवर आण्णासाहेबांची ही दोन नाटके अजरामर ठरली. आजही या नाटकांचे प्रयोग होत असतात.

आण्णासाहेबांचे तिसरे नाटक ‘रामराज्य वियोग’. हे नाटक अपूर्ण अवस्थेत असतानाच पुण्यामध्ये दि. २० ऑक्टोबर १८८४ रोजी पहिला प्रयोग झाला. मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाची सुरुवात आण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकापासून खऱ्या अर्थाने झाली असे म्हणता येईल.

दि. २/११/१८८५ रोजी अण्णासाहेबांचे निधन झाले.

Top

कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकर

जन्म : २५/११/१८७२ मृत्यु : २६/८/१९४८

नाट्याचार्य खाडिलकरांचा जन्म सांगली येथे झाला. शिक्षणासाठी पुण्यास आले. शिक्षणानंतर सांगलीला काही दिवस शिक्षक झाले. याच काळात त्यांनी आपले पहिले ‘सवाई माधवराव याचा मृत्यू’ नाटक लिहिले. पुढे ‘केसरी’ मध्ये पुणे येथे आल्यानंतर दुष्काळ पडलेल्या विजापूर भागात फिरत असता तालीकोटचा किल्ला पाहून काकासाहेबांनी ‘कांचनगडची मोहना’ हे नाटक लिहिले. या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील ‘सोशल क्लब’ने केला (१९१८) ‘कीचकवध’, ‘बायकांचे बंड’, ‘भाऊबंदकी’, ‘प्रेमध्वज’ अशी सहा गद्य नाटके लिहिली. ‘कीचकवध’ नाटकाचा प्रयोग अत्यंत सुंदर व स्फूर्तीदायक होत असे.

दि. १२/३/१९११ रोजी संगीत नाटकात क्रांती करणारे ‘संगीत मानापमान’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले आणि चिरंजीव झाले. आजपर्यंत या नाटकाचे कैक कंपन्यांनी शेकडो प्रयोग केले नि करीत आहेत. पुढे दोन वर्षांनी त्यांचे दुसरे संगीत नाटक ‘विद्याहरण’ किर्लोस्कर नाटक मंडळीने रंगभूमीवर आणले. (३१/५/१९१३) यानंतर बालगंधर्व, गणपतराव बोडस व गोविंदराव टेंबे यांनी गंधर्व नाटक मंडळी सुरु केली व काकासाहेबांनी त्यांना ‘संगीत स्वयंवर’ नाटक दिले. ‘सत्त्वपरीक्षा’ हे सातवे नाटक त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीना दिले. काकासाहेबांनी एकंदर आठ गद्य नाटके आणि सात संगीत नाटके मराठी रंगभूमीला दिली. ते स्वतः निर्णय संपादक, निर्भीड लेखक, खंदे पत्रकार, यशस्वी नाटककार तर होतेच पण त्याहीपेक्षा ते उत्तम नाट्यशिक्षक होते. नाट्यशिक्षणाचे काम ते जणू धार्मिक श्रद्धेने करीत असत. नव्या नाटककाराला पुढे आणण्यात ते सर्वतोपरी साहाय्य करीत.

नाट्यक्षेत्रातील भीष्माचार्य असे हे व्यक्तिमत्त्व २६/८/१९४४ रोजी अनंतात विलीन झाले.


Top

रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व

जन्म : ३/१/१८८६ मृत्यु : १२/८/१९५२

रामभाऊंचा पिंड गायकाचा. पण त्याकाळी गायनाचा स्वतंत्र व्यवसाय पैसे देणारा नव्हता, म्हणूनच गाणे शिकुनही गवयांना पोटासाठी रंगभूमीकडे वळावे लागे. रामभाऊंना मात्र ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’त चालकांनी जवळ जवळ ओढूनच नेले(१९०९).

ते मुख्य स्त्री भूमिका करीत. त्यांची सुभद्रेची आणि संत साखुची कामे आणि पदे उत्कृष्ट होत असत. श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांनी त्यांनी सहज ‘सवाई गंधर्व’ म्हटले आणि दुसऱ्याच दिवशी ‘सवाई गंधर्व’ अशी अक्षरे कोरलेले सुवर्णपदक त्यांना देण्यात आले.

१९१३ मध्ये रामभाऊ ‘प्रवर्तक’ नाटक मंडळीतून ‘भारत नाट्यकला मंडळी’ मध्ये गेले. पण फार काळ तेथे राहू शकले नाहीत. त्यांनी स्वतःची ‘नूतन संगीत नाटक मंडळी’ १९१४ मध्ये काढली. आता ते अधून मधून पुरुष भूमिका करू लागले होते. माधवराव जोशींचे ‘विनोद’ हे सामाजिक नाटक त्यांनी १९१४ मध्ये रंगभूमीवर आणले.

१९२४ मध्ये ‘नूतन मंडळी’ बंद पडल्यावर सवाई गंधर्वांनी दोन वर्षे विश्रांतीच घेतली. शंकरराव सरनाईक यांनी त्यांना १९२६ मध्ये पुन्हा ‘यशवंत नाटक मंडळी’त खेचले. १९३० मध्ये हिराबाई बडोदेकरांच्या नाट्य शाखेत ते राहिले. ‘सौभद्र’ मध्ये कृष्णाचे पेटंट काम ते करीत.

दि. ७/८/१९४३ रोजी पुण्यात गाणे झाल्यानंतर पक्षघाटाचा झटका येऊन ते आजारी पडले. त्यानंतर ते काही रंगभूमीवर आले नाहीत. किंवा फारसे गायले नाहीत. त्यांनी आपली शिष्य परंपरा मागे ठेवली आहे. फिरोज दस्तूर, भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल हे त्यांचे शिष्य.


Top

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

जन्म : १३/८/१८९८ मृत्यु : १३/६/१९६९

एक थोर शिक्षणतज्ञ, समर्थ नाटककार, निर्भीड टीकाकार, पत्रकार, प्रतिभावान कवी, आद्य विडंबनकार, महान साहित्यिक, पटकथा लेखक, झुंजार राजकारणी, उत्कृष्ट विनोदी वक्ता अशा अनेक पैलूंनी परिपूर्ण असे हे व्यक्तिमत्व.

‘बालमोहन नाटक मंडळी’चे चालक दामुअण्णा जोशी यांनी आपल्या कंपनीसाठी अत्रेंकडून ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक लिहून घेतले आणि ते रंगभूमीवर १०/५/१९३३ साली आणले. हेच यांचे पहिले सुंदर विनोदी नाटक. नंतर १९५० पर्यंत म्हणजे ‘बालमोहन नाटक कंपनी’ बंद पडेपर्यंत त्यांची एकूण ९ नाटके रंगमंचावर आली. ‘साष्टांग नमस्कार’ (१९३३), ‘घराबाहेर’ (१९३४), ‘भ्रमाचा भोपळा’ (१९३५), ‘उद्याचा संसार’ (१९३७), ‘लग्नाची बेडी’ (१९३६), ‘वंदे मातरम्’ (१९३७), ‘मी उभा आहे’ (१९३९), ‘जग काय म्हणेल?’ (१९४६). १९३८ साली ‘नाट्यकला प्रवर्तक’ नाटक कंपनीसाठी ‘पराचा कावळा’ हे विनोदी नाटक लिहिले.

गाजलेल्या काझी खटल्यावर आचार्य अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतनने’ रंगभूमीवर आणले (१९६२). त्यानंतर १९६३ मध्ये ‘अत्रे थिएटरर्स’ ही नाट्यसंस्था काढली आणि ‘मोरूची मावशी’ (१९६३), ‘बुवा तेथे बाया’ (१९६४), ‘मी मंत्री झालो’ (१९६६), ‘डॉ. लागू’’ (१९६७), ‘प्रीतीसंगम’ (१९६८) आणि ‘ब्रह्मचारी’ (१९६९) ही नाटके रंगभूमीवर आणली. मराठी रंगभूमीवर १९३३ ते अगदी १९६९ पर्यंत अगदी समर्थपणे आपल्या लेखणीने त्यांनी अधिराज्य केले.

मराठी रंगभूमीवर एवढ्या मोठ्या कालखंडानंतर आपल्या नाटकाचा प्रभाव असणारा दुसरा नाटककार अपवादानेच आढळेल. समाजातील ढोंग आणि व्यंग दिसेल त्याचे दर्शन घडवणारे – ‘साष्टांग नमस्कार’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘लग्नाची बेडी’, ‘ब्रह्मचारी’ सारखी नाटके किंवा समाजावर टीका करणारी, समाज सुधारणा विषयक –‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘जग काय म्हणेल’ यासारखी नाटके काय किंवा समाजात घडलेल्या घटनांवरील न्यायालयीन नाटके ‘तो मी नव्हेच’, ‘डॉ. लागू’, अशी अनेक नाटके रंगभूमीवर कायम स्मरणात राहतील.

Top

नानासाहेब जोगळेकर

मृत्यू : १५/११/१९११

भाऊराव कोल्हटकरांच्या निधनानंतर किर्लोस्कर नाटक मंडळीला नव्या नटाची जरुरी होती व शोधण्याचे काम चालू होते. पुण्यात लोकमान्य टिळकांच्या लॉ क्लासमध्ये कायद्याचा अभ्यास करणारे जोगळेकर भाऊरावांच्या समाचारास गेले असता त्यांना गायला सांगितले. भाऊरावांना पसंत पडले. लोकमान्य टिळकांनी अनुमती दिल्याने जोगळेकर ‘किर्लोस्कर मंडळीत’ आले.

भाऊरावांसारख्या अलौकिक नटाच्या जागेवर आपण काम करणार आहोत. याची जाणीव ठेवूनच ते वागत नि कामे करीत. त्यांचा आवाज अतिशय गोड नी चढा होता. कंपनीची मालकी गळ्यात पडल्यानंतर त्यांच्या आमदनीत किर्लोस्कर मंडळीने आपल्या लोकोपयोगी कार्यात भर घातली. किर्लोस्कर थिएटर बांधले. ‘रंगभूमी’ मासिक काढले. नाट्यसंग्रहालय उघडले.

जुन्या नाटकात ते आपल्या गायनाने बहार आणीत. ते नट, संगीत नट, पूर्ण यशस्वी नट म्हणून चमकले ते ‘मानापमान’ नाटकातील धैर्याधराच्या भूमिकेत. जोगळेकरांसारख्या धैर्यधर रसिकांच्या कायम लक्षात राहील अशी त्यांनी ही चिरस्मरणीय भूमिका केली होती.


Top

बाळ कोल्हटकर

मूळचे सातारचे राहणारे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे पुतणे, अभिनयाचे व लेखनाचे गुण त्यांच्या रक्तातच होते. उमेदवारीच्या काळात नटसम्राट बालगंधर्व, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांच्या सारख्यांकडून त्यांच्यावर नकळत संस्कार झाले. नाटकातील वाक्ये बोलताना त्यातील योग्य शब्दांवर आघात करून बोलण्याचे कसब त्यांच्या अंगी होते.

एकाच प्यालातील – ‘तळीराम’, ‘भावबंधन’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ यासारख्या नाटकातून भूमिका साकारल्या. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकाने खऱ्या अर्थाने नाटककार म्हणून ओळख झाली.

‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाराचे हात हजार’ ही काही इतर उदंड लोकाश्रय मिळालेली त्यांची नाटके.

Top

बाळकोबा नाटेकर

जन्म : १८५५ मृत्यु : ९/८/१९०१

आण्णासाहेब किर्लोस्करांना ‘संगीत शाकुंतल’साठी ज्या आणखी एका ज्येष्ठ गायकाची जोड मिळाली ते हे बाळकोबा नाटेकर. ते गायक नट होते. तसे उत्कृष्ठ घरंदाज गवई होते. तल्लख स्मरणशक्ती व विलक्षण ग्रहणशक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होत.

शास्त्रोक्त पद्धतीने अभिजात संगीताचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. बीन, सरोद आणि सतार ही तंतुवाद्ये वाजविण्यातही ते प्रवीण होते. संगीत शास्त्रांचाही त्यांनी व्यासंग केला होता. ‘शाकुंतल’ नाटकात ते विविध भुमिका करीत. पहिल्या अंकात नांदीतील परिपार्श्वक आणि सारथी, दुसऱ्यात शिष्य, तिसऱ्यात काम नाही, चौथ्यात कण्व, पाचव्या आणि सहाव्या अंकात कंचुकी आणि सातव्या अंकात मातली. ‘सौभद्र’ नाटकात ते नारदाची आणि कृष्णाची भूमिका करीत.

कंपनीच्या भागीदारीत जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी त्यांनी महिना रु. २००/- पगार ठरविला. पुढे १८९० मध्ये आवाजात बिघाड झाल्यामुळे तो रु. १५०/- करण्यात आला. १८९३ साली पगाराच्याच बाबतीत तेढ निर्माण झाल्यामुळे ते निवृत्त झाले. परंतु दुसऱ्या कोणत्याची कंपनीत न जाता त्यांनी आपले उर्वरित आयुष्य गायन शिक्षण, सतार शिक्षण किंवा कधी खाजगी गाणे करून घालविले.

संगीत नाटकांना सुयोग्य वळण लावणारा संगीत नाटकातील पदे म्हणजेच खरे संगीत मानणारा असा हा थोर गायक कलावंत.

Top

केशवराव भोसले

जन्म : ९/८/१८९० मृत्यु : ४/१०/१९२१

मराठी रंगभूमीवरील एक असामान्य व्यक्तिमत्व. बालगंधर्वांचे युग एकीकडे असताना आपल्या कर्तृत्वाने अवघ्या महाराष्ट्राला आपली ओळख एक महान नट म्हणून करून देणारा हा कलावंत. ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’च्या आश्रयाला आलेला हा पोर. एकदा पंढरपूरच्या मुक्कामात ‘शारदा’ नाटकाच्या प्रयोगाचे वेळी शारदेचे काम करणारा कृष्णा देवळी आजारी पडला आणि केशवरावांनी आपण होऊन शारदेचे काम केले आणि ते इतके सुंदर केले की ते त्याला कायमचेच देण्यात आले. ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे पद पुनः पुनः ऐकण्यास, गावोगावी लोक प्रचंड गर्दी करू लागले.

जनुभाऊ निमकरांनी त्यांना आपल्या कडक शिस्तीत आणि तालमीत तयार केले. बसवून दिलेल्यापेक्षा नटाने अधिक स्वैरपणे गायचे नाही हा त्यांचा नियम. १९०३ मध्ये यवतमाळ येथे केशवरावांनी टाळ्यांना हुरळून जाऊन एक जादा तान मारली आणि आत येताच ‘शारदे’च्या नाजूक गालावर जनुभाऊंची बोटे काडकन वाजली. पुढे केशवरावांनी ‘स्वदेश हितचिंतक’ कंपनी सोडून ‘ललितकलादर्श नाटक मंडळी’ दि. १/१/१९०८ रोजी सुरु केली. स्वतः दोन वर्षे जांभेकर बुवांकडून संगीताचे शिक्षण घेतले. पुण्याला नव्या कंपनीने ‘सौभद्र’ लावले. बालगंधर्वांचे पुष्कळ चाहते प्रयोगाला टर उडविण्यासाठी उपस्थित राहिले, पण घडले उलटेच. केशवरावांच्या गायनाने ते सारख्या टाळ्याच वाजवीत राहिले. एवढा केशवरावांच्या गाण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

‘ललितकलादर्श’ ला वीर वामनराव जोशी यांच्या ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ या नाटकाने अमाप यश दिले. पैसा दिला आणि प्रसिद्धीही दिली. याच नाटकापासून केशवरावांनी रंगभूमीवर मखमली पडदा ड्रॉप म्हणून लटकवला आणि मग तीच प्रथा सुरु झाली. ‘ललितकलादर्श’ नाटक कंपनीला बडोदा, ग्वाल्हेर नि इंदूर संस्थानिकांकडून आलेल्या ‘आश्रय’ देण्याच्या योजना साभार नाकारून त्यांनी आपली कंपनी ‘खास लोकाश्रया खालील’ असे मोठ्या अभिमानाने जाहीर केले.

१९१६ साली मामा वरेरकरांचे ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक संगीत करून सादर केले. एक वर्षाने मामांचे ‘संन्यासाचा संसार’ नाटक रंगभूमीवर आणले.

‘टिळक स्वराज फंडा’साठी नाटकाच्या इतिहासामध्ये नोंद करावी लागेल असा अभूतपूर्व ‘गंधर्व-ललितकलादर्श’ नाटक कंपनीचा बालगंधर्व व केशवराव भोसले या दोन मातब्बर नटांचा ‘मानापमान’ या नाटकाचा संयुक्त प्रयोग झाला. दि. ८/७/१९२१ रोजी झालेल्या या प्रयोगाने उत्पन्नाचा सर्वोच्च विक्रम केला. केशवरावांनी धैर्यधराच्या भूमिकेत प्रत्येक पदाला वन्समोअर घेतला. ‘धिक्कार मन साहिना’ या पदाला तर त्यांना सात वेळा वन्समोअर मिळाला.

संयुक्त ‘मानापमान’च्या झळाळीच्या यशाने हुरूप येऊन ‘संयुक्त सौभद्र’ लावण्यात आले. केशवराव अर्जुन तर बालगंधर्व सुभद्रा. सुभद्रेच्या पदांनी बालगंधर्वांनी बाजी मारली खरी परंतु केशवरावांनी म्हटलेल्या ‘माझ्यासाठी तिने अण्णा वर्जीयले’ या एका सध्या अभंगाने एकदम पारडे फिरले आणि केशवरावांचा जयघोष प्रेक्षकांनी सुरु केला.

रंगभूमीवर स्वतःची अशी एक दैदिप्यमान वेगळी ओळख निर्माण करणारा हा ‘संगीत सूर्य’ ‘संयुक्त सौभद्र’च्या प्रयोगानंतर एक महिन्याच्या आत विषमज्वराचे निमित्त होऊन एकाएकी अस्ताला गेला.


Top

मास्टर दिनानाथ (मंगेशकर)

जन्म : २८/१२/१९०० मृत्यु : २४/४/१९४२

गोमंतकातील मंगेशी गावच्या दीनानाथांचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता. भिंगरीसारख्या गोड आवाजाची ईश्वरदत्त देणगी असल्याने लहानपणी दिनानाथ पदे गाऊन दाखवीत. देवस्थानच्या उत्सव प्रसंगी होणाऱ्या नाटकातून लहान सहान भूमिका करीत.

१९१४ साली म्हापशे मुक्कामी त्यांचा ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त प्रवेश झाला. त्या आधी किर्लोस्कर नाटक मंडळीत एक मोठी फाटाफूट झाली होती. बालगंधर्व, बोडस आणि गोविंदराव टेंबे निघून गेले होते. किर्लोस्कर मंडळीत दीनानाथांचे बस्तान चांगले बसले. ‘संदेश’ कार कोल्हटकरांनी त्यांच्या ‘सुंदोपसुंद’ नाटकाचे वेळी दीनानाथांची ‘मास्टर दिनानाथ’ अशी जाहिरात केली आणि तेच नाव रूढ झाले. १९१६ मध्ये गडकऱ्यांच्या ‘पुण्यप्रभाव’ नाटकात किंकिणीच्या कामात त्यांनी अगदी कमाल केली होती. किंबहुना त्या नाटकाच्या यशात अर्धा वाट त्यांचा होता.

१९१७ साली किर्लोस्कर नाटक मंडळीत पुनः फाटाफूट झाली. मास्टर दिनानाथ, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी स्वतःची ‘बलवंत संगीत मंडळी’ काढली. जुन्या नाटकांबरोबरच कंपनीने एकामागून एक ‘जन्मरहस्य’, ‘वीर विडंबन’, हिंदी ‘मानापमान’, ‘भावबंधन’, ‘राजलक्ष्मी’, ‘उग्रमंगल’, ‘चौदावे रत्न’, ‘देशकंटक’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘गैरसमज’, ‘ब्रह्मकुमारी’ ही मात्तबर नाटककरांची नाटके रंगभूमीवर आणली. गडकऱ्यांची ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपूर्ण नाटके देखील सादर केली. वीररस हा दीनानाथांचा आवडता रस असल्याने वीर वामनरावांनी लिहिलेले ‘रणदुंदुभी’ नाटकातील ‘तेजस्वीनी’ त्यांनी अत्यंत प्रभावीपणे उभी केली. त्यांच्या त्या भूमिकेतील ‘परवशता पाश दैवी’, ‘दिव्या स्वातंत्र्य रवि’, ‘जगी हा खास वेड्यांचा’, ही पदे सर्वांच्या तोंडी झाली होती. ‘बलवंत नाटक मंडळी’चा जन्म १९१८ मध्ये. पण तिला ‘मानापमान’ करण्याचे हक्क मिळाले १९२७ साली. मा. दीनानाथांनी उभ्या केलेल्या ‘मानापमान’ मधील धैर्यधराने कहर केला. १९११ ते १९२७ पर्यंत होऊन गेलेल्या नानासाहेब जोगळेकर आणि केशवराव भोसले या पट्टीच्या धैर्यधराना त्यांनी मागे टाकले. धैर्यधराच्या पोशाखात क्रांती केली. चार अंकात चार तऱ्हेची वेशभूषा. काही पदांच्या चाली बदलल्या. पल्लेदार आवाजाचा हा रुबाबदार नवा धैर्यधर प्रेक्षकांना एकदम पसंत पडला. एक तपावर उत्कृष्ठ स्त्री भूमिका करणाऱ्या नटाने अशी धैर्यधराची भूमिका करणे महाकठीण काम होते.

१९३४ साली कंपनीच्या चालकांना चांगली चाललेली कंपनी बंद करून तिचे बोलपट कंपनीत रुपांतर करण्याची बुद्धी झाली आणि ‘कृष्णार्जुन युद्ध’ बोलपटाने त्यांना जबरदस्त आर्थिक तडाखा बसला. १९३८ मध्ये सांगली येथे ‘बलवंत’चे पुनरुज्जीवन दीनानाथांनी केले पण दीड दोन वर्षातच ती बंद करावी लागली.

दिनानाथ अतिशय सुंदर होते. दाट कुरळे केस, तरतरीत नाक, विशाल भालप्रदेश, पाणीदार डोळे, उंच नि सडपातळ बांधा हे सर्व ईश्वरदत्त होते. आवाज मधुर, गाणी तडफदार! तसेच स्वभाव चंचल पण भावनाप्रधान. तीव्र बुद्धी आणि दांडगी कल्पकता. ते उत्तम सारंगी वादक होते. त्यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढ अभ्यास होता. अवघ्या एकेचाळीसाव्या वर्षी निवर्तले. या थोर नटाला शेवटचे दिवस हालात, हलाखीत काढावे लागले हा दैवदुर्विलासच होता.


Top

वीर वामनराव जोशी

जन्म : २१/३/१८८१ मृत्यु : २/६/१९५६

लोकमान्य टिळकांपासून स्फुर्ति घेऊन सरळ राजकीय चळवळीत दाखल झालेले वीर वामनराव जोशी अखेरपर्यंत राष्ट्रकार्य करीत राहिले. वामनरावांची मुंबईतील जळजळीत भाषणे ऐकून केशवराव भोसलेंनी त्यांच्याचकडे नव्या नाटकाची मागणी केली. वामनरावांनी ताबडतोब ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ हे नाटक लिहून दिले. नाटकात स्वातंत्र्य, न्याय, धर्म, स्वाभिमान, हे विषय भरपूर होते. केशवराव भोसलेंनी अत्यंत परिश्रम घेऊन हे नाटक रंगभूमीवर आणले आणि कंपनीला त्याने अफाट पैसा नि लौकिक मिळवून दिला.

वामनरावांची दुसरी नाट्यकृती ‘रंगदुंदुभी’ हेही तसेच कठीण नाटक. ‘बलवंत संगीत मंडळी’ने ते मोठ्या जिद्दीने सादर केले दि. १७/२/१९२७ रोजी. प्रयोग अतिशय उत्तम व्हायचा. मा. दीनानाथांनी म्हणलेली ‘परवशता पाश दैवे’, ‘जगी हा खास वेड्यांचा’, ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ ही पदे ज्याच्या त्याच्या तोंडी झाली होती.

त्यांचे तिसरे नाटक ‘धर्म सिहासन’ दि. १९/७/१९२९ रोजी ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’ने रंगभूमीवर आणले. परंतु या नाटकाचा पहिल्या दोन नाटका इतका बोलबाला झाला नाही. त्यांची सर्वच नाटके तत्वाप्रधान, वीररसप्रधान आणि राजकारणप्रधान झाली आहेत.


Top

राम गणेश गडकरी

जन्म : २६/५/१८८५ मृत्यु : २३/१/१९१९

मराठी रंगभूमीवर कल्पकता आणि कोटीबाजपणा यांनी नटलेला विनोद, रहस्यपूर्ण नाट्यकथानक, करूण व हास्य यांचा परमात्कर्ष साधणारा आणि हृदय हेलावून टाकणारे नाट्यप्रसंग, चमचमणारी अलंकारिक भाषा, अशी विशेषत्व असलेला हा कवी, लेखक, नाटककार म्हणून राम गणेश गडकरी यांचे वर्णन करावे लागेल.

१९०४ मध्ये ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’मध्ये मुलांकरिता मास्तर म्हणून राहिले. पुढे ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये शाळा मास्तर झाले. कवी आणि विनोदी लेखक यापेक्षा गडकऱ्यांचा नाटककार म्हणूनच अधिक लौकिक आहे. ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचे पुर्नविवाहावरील नाटक ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ने १९१२ साली रंगभूमीवर आणले. त्यानंतर ‘पुण्यप्रभाव’ किर्लोस्कर नाटक मंडळी. (१९१६) त्यांच्या हयातीत ही दोनच नाटके रंगभूमीवर आली.

त्यांच्या निधनानंतर ‘एकाच प्याला’ आणि ‘भावबंधन’ ही त्यांची नाटके ‘गंधर्व नाटक मंडळी’ आणि ‘बळवंत नाटक मंडळी’ ने १९१९ मध्ये रंगभूमीवर आणली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. ‘भावबंधन’ हे नाटक गडकऱ्यांनी खास ‘बळवंत नाटक मंडळी’करिता लिहिले होते. त्यांची अपूर्ण राहिलेली नाट्यकृती ‘राजसंन्यास’ ही सुद्धा एक अलौकिक अशी नाट्यकृती आहे.

अवघ्या चौतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. मराठी रंगभूमीवरील एक दैदीप्यमान तारा असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.


Top

जयराम शिलेदार

जन्म : १९१७च्या सुमारास

एक मराठी रंगभूमीच्या ऐन वैभवकाळात १९१७ च्या सुमारास शहापूर बेळगाव इथे जन्म झाला व १९३२ च्या रंगभूमीच्या ऐन पडत्या काळात शिलेदार रंगभूमीवर ठामपणे उभे राहिले. लहानपणापासून त्यांना नाटकाचा नाद होता. १९३२ च्या सुमारास रघुवीर सावकार यांच्या नाट्य मंडळीत प्रवेश केला. कागलकरबुवा व निळकंठराव चिखलीकर यांच्याकडे जुजबी शिक्षण (गायनातले) परंतु रघुवीर सावकार हे गाण्यातील त्यांचे पहिले गुरु. ‘संशयकल्लोळ’ नाटकातील स्त्रीवेशात नमनाचे गाणे म्हणून त्यांनी आपल्या नाट्य जीवनाचा श्रीगणेशा केला.

मानापमानातील-धैर्यधर, भामिनी अशी दोन्ही कामे ते करत असत. मृछाकटिक मधील शर्विलक, सौभद्र-अर्जुन, मानापमान-विलासधर, स्वयंवर-कृष्ण, शारदा नाटकात इंदिराकाकू या त्यांच्या विशेष गाजलेल्या भूमिका.

१९४९ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘मराठी रंगभूमी’ या स्वतःच्या नाट्य संस्थेचा प्रारंभ केला. परंतु काही अडचणींमुळे संस्था बंद पडली. कालांतराने अनुभवाचे चटके सोसत स्वतःची नाट्य-संस्था चालविताना ज्या ज्या अडचणी आल्या त्यांचा निरस करण्याची तयारी करून ५ ऑगस्ट १९५३ साली पुन: नव्या जोमाने ‘मराठी रंगभूमीची’ सुरुवात केली. भरदार देहयष्टी व रंगभूमीला हवा तसा तेजस्वी आवाज या दोन दैवी देणग्या शिलेदारांना लाभल्या होत्या.

तरुणपणी ‘मानापमान’ मधील धैर्यधर होणाऱ्या शिलेदारांनी उतारवयात लक्ष्मिधराची भूमिका स्वीकारली. स्वतःच्या कामाचा काय परिणाम होईल याचा विचार करणाऱ्या संस्थांच्या प्रमाणे त्यांनी विचार केला नाही. केवळ संस्था चालली पाहिजे, संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक नवीन नाटके बसविली. व आपल्या कलेचा वारसा आपल्या कन्या लता व कीर्ती शिलेदार यांना सोपवून रंगभूमीवरून निवृत्त झाले.


Top

गणपतराव जोशी

जन्म : १५/८/१८६७ मृत्यु : ७/३/१९२२

मराठी रंगभूमीवर स्वरसम्राट, अभिनय सम्राट, महाराष्ट्राचे गॅरिक अशा बिरुदांनी गौरवलेले गणेश कृष्ण तथा गणपतराव जोशी खऱ्या अर्थाने नटसम्राट होते. घरच्या गरिबीमुळे वडील गेल्यानंतर खणखणीत आवाज असल्यामुळे ‘गणू’ रामदास स्वामींचे श्लोक म्हणत घरोघर कोरान्न मागू लागला. याचा सुमारास ते एकदा ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त पळून गेले होते. पण त्यांना परत आणण्यात आले. नंतर ते कृष्णाजी बजाजी जोशी यांनी काढलेल्या ‘श्री शाहू नगरवासी नाटक मंडळी’त गेले ते मात्र कायमचे. याच कंपनीचे पुढे गणपतराव मालक झाले.

पुण्यातील इंग्रजीचे प्रोफेसर वा. बा. केळकर यांचा शाहू नगरवासीवर लोभ जडला. केळकरांनी आगरकरांचे नवे ‘विकार विलसित’ (हॅम्लेट) मंडळीकडून बसवून घेतले. तसेच त्यांनी स्वतः ‘त्राटिका’ (टेनिंग ऑफ धी श्रू) लिहून दिले. महादेव शास्त्री कोल्हटकरांच्या ‘ऑथेल्लो’ रुपांतराची देवलांनी केलेली रंगावृत्ती ‘झुंजारराव’, ‘तारा’, (सिंबेलाईन) या बरोबरच ‘कांतीपूरचे दोन गृहस्थ’ (टू जंटलमेन ऑफ व्हेरोना) हेही नाटक रंगभूमीवर आणले. म्हणजे १८९२ पर्यंत गणपतरावांनी शेक्सपिअरची पाच नाटके रंगभूमीवर आणली. शेरिडंच्या ‘पिझारो’ नाटकावरून लिहिलेले ‘राणा भीमदेव’ हे अत्यंत यशस्वी रुपांतर फारच गाजले. त्या नाटकातील गणपतरावांचे भिमदेवांच्या भूमिकेतील आवेशपूर्ण भाषण प्रेक्षकांना थरारून सोडी. नंतर ‘मानाजीराव’ (मॅकबेथ) आले. १९०१ मध्ये ‘संत तुकाराम’ हे नाटक गणपतरावांच्या तुकारामाच्या सुंदर भूमिकेमुळे फारच लोकप्रिय झाले होते. शेक्सपिअरची आणखी दोन नाटके ‘कपिध्वज’ (किंग जॉन) आणि विश्वामित्र (सायमन ऑफ अथेन्स) त्यांनी रंगभूमीवर आणली. गणपतराव जोशी आणि बलवंतराव जोग ही त्या मंडळीतील नटांची जोडी तेव्हा ‘गण्या-बाळ्या’ या लाडक्या नावाने ओळखली जात होती. जोग १९१० मध्ये वारले आणि पुढे गणपतरावांनी नाटक मंडळी कशी बशी दहाबारा वर्षे चालविली. ‘विजय नगरचा डळमळीत राजमुकुट’, ‘पन्नारत्न’, ‘माझी बहिण’, ‘जातीवंत मराठा वीर’ यासारखी नाटक त्या दरम्यान त्यांनी रंगभूमीवर आणली. पण त्यांना पूर्वीची शान कधीच आली नाही.

ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या नाटक कंपनीत चांगले नट किंवा सिनसिनरी नसायची, पण केवळ स्वतःच्या एकट्याच्या कर्तृत्वावर ते नाटक पार पाडायचे. आणि प्रेक्षक पण त्यांच्याकरिता यायचे. त्यांच्या हॅम्लेटच्या भूमिकेचे मोठे मोठे इंग्रज सरकारी अधिकाऱ्यांनी वारेमाप कौतुक केले होते. १९२१ मध्ये जलोदराने आजारी पडून १९२२ मध्ये हा महान नट अस्ताला गेला.

Top

गणपतराव बोडस

जन्म : २/७/१८८० मृत्यु : २३/१२/१९६५

मुलाची नाटकाची हौस पाहून आईने ‘नाटकमंडळीत जायचे असेल तर मोठ्या किर्लोस्कर मंडळीत तरी जा’ असा सल्ला देऊन दि. ३०/९/१८९५ रोजी ‘किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी’त प्रवेश करून दिला. प्रत्येक नाटक विंगेमध्ये बसुन गणपतराव प्रत्येक नटाच्या अभिनयाचा अगदी बारकाईने एकलव्याप्रमाणे अभ्यास करीत.

देवलांनी ‘मृच्छकटिक’ नाटकात शंकराची भूमिका शिकविली आणि तीच पुढे त्यांची पेटंट झाली. ‘मूकनायक’मधील प्रमोद, ‘गुप्तमंजुष’ नाटकातील शृंगीचे काम तर कमालीचे सुंदर होत असे. देवलांची नाट्यशिक्षण पद्धती त्यांनी हुबेहुब आत्मसात केली. ‘मानापमान’ नाटकात लक्ष्मीधर तेवढाच गाजला.

१९१३ मध्ये ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’तुन फुटून बालगंधर्व आणि टेंबे यांच्याबरोबर ‘गंधर्व नाटक मंडळी’ काढली. या कंपनीने गद्य नाटक फाल्गुनराव संगीत करून ‘संशयकल्लोळ’ नावाने रंगभूमीवर आणले. बोडसांनी उभा केलेला ‘फाल्गुनराव’ चिरंजीव झाला आहे. ‘स्वयंवर’ नाटकात कृष्ण व नंतर असलेल्या ‘एकाच प्याला’ नाटकातील सुधाकारची धीरगंभीर भूमिका करून बोडसांनी यशाचा मोठा तुरा खोवला.

१९१९ मध्ये कंपनीची भागीदारी सोडून ‘यशवंत संगीत मंडळी’त व्यवस्थापक म्हणून राहिले. गंधर्व नाटक कंपनीत ते पुन्हा एक वर्षाकरिता आले आणि १९२२ मध्ये पुन्हा ती कंपनी सोडली. १९२३ पासून बोडस ‘नाइट’ पद्धतीने कामे करू लागले. त्या काळात बोडस अडीचशे रुपये नाईट दराने कामे करीत. १९२८ ते १९३१ पर्यंत चार वर्षे ते पुनः गंधर्व नाटक मंडळीत राहिले. त्यानंतर १९५६ पर्यंत अधून मधून फाल्गुनराव, लक्ष्मीधर, कांचनभट या भूमिका करीत. बोडस हे हाडाचे नट होते. उतार वयातही ते नाटकातच रमत. १९४० साली त्यांनी ‘माझी भूमिका’ या नावे आपले आत्मवृत्त प्रसिद्ध केले.

Top

माधवराव जोशी

जन्म : ७/१/१८८५ मृत्यु : १६/१०/१९४८

१९१३ मध्ये रंगभूमीवर सवाई गंधर्वांच्या ‘नूतन संगीत मंडळी’ने माधवरावांचे ‘विनोद’ नावाचे नाटक रंगभूमीवर आणून पुण्यात खळबळ उडविली होती. त्यापूर्वी १९१० मध्ये ‘कर्णार्जुन’ आणि ‘कृष्णाविजय’ या दोन पौराणिक नाटकांच्या अपयशामुळे, यापुढे केवळ विनोदी, विडंबनात्मक, उपहासगर्भ नाटकेच लिहायची अशी त्यांची भूमिका होती. त्यांचे इंग्रजी फार्सचे वाचन दांडगे होते. जोशींनी १५-१६ नाटके लिहिली. ‘वऱ्हाडचा पाटील’, ‘मोराचा नाच’, ‘पैसाच पैसा’ यासारखी काही चालली आणि ‘स्थानिक स्वराज्य’ अथवा मुनिसिपालीटी’ नाटक बेहद्द लोकप्रिय झाले. त्यांच्या नाटकात मुख्य रस म्हणजे हास्यरस आणि त्यांचे मुख्य हत्यार म्हणजे उपहास. आपली नाटके स्वतःच बसवून घेत. त्यांच्या प्रत्येक नाटकात सूत्रधार नटीचे व तत्सम प्रवेश असत आणि त्याचा उपयोग आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तरे देण्याकरिता, आपले विचार मांडण्याकरिता, आपले समर्थन करण्याकरिता करीत. मराठी रंगभूमीवर या नाटककराचे नाव मानाचे राहिले.


Top

नाना शिरगोपीकर

जन्म : २/४/१९२०

नानासाहेब शिरगोपीकरांना नाट्यकलेचा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील आण्णासाहेब शिरगोपीकर यांनी ऑक्टोबर १९२३ मध्ये ‘बालनटांची आनंद संगीत मंडळी’ स्थापन केली. ‘सोन्याची द्वारका’ व ‘गोकुळचा चोर’ या नाटकांचे त्या काळात अनुक्रमे २००० ते ३००० प्रयोग झाले. विविध कलांचा नानांचा अभ्यास होता.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांना ‘आनंद संगीत मंडळी’ मध्ये दाखल झाले. त्यांच्या नाटक मंडळीचे ते उत्तम व्यवस्थापक होते. चोख हिशेब व त्याच्या नोंदी हे त्यांचे वैशिष्ठ्य. १९५६ साली वडिलांच्या निधनानंतर ‘आनंद संगीत मंडळी’ची धुरा हाती घेतली. आगीत कंपनीचे सामान जळून गेल्यानंतरही मोठ्या उमेदीने ते उभे राहिले.

‘गोकुळचा चोर’ या नाटकाचे तीन हजार प्रयोग व्हावेत ही वडिलांची इच्छा नानासाहेबांनी १९६१ मध्ये पूर्ण केली. १९६२ नंतर कंपनीचे स्वरूप बदलत त्यांनी ‘एखाद्याचे नशीब’, ‘नवमीची रात्र’ व ‘चंदनाची पेटी’ सारखी नाटके रंगभूमीवर आणली. परंतु त्यांच्या संस्थेच्या एक विशिष्ठ प्रतिमेच्या या नाटकांचा फायदा झाला नाही. नानासाहेब परत पौराणिक नाटकाकडे वळाले. ३० मे १९६४ रोजी ‘भाव तोचि देव’ हे नाटक रंगभूमीवर आणले. नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

ट्रीक सिन्स ही नानासाहेबांची खासियत. ते त्यांच्या नाटकाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असे. ‘परीक्षेपूर्वीच्या सात रात्री’ सारखे, वेगळ्या विषयावरचे देखील नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. १९७० पर्यंत त्यांचा या व्यवसायात जम बसला. त्यानंतर ‘ललित कलादर्श’ संस्थेबरोबर ‘शाबास बिरबल शाबास’ हे नाटक सहयोगाने रंगभूमीवर आले. ‘सोन्याची द्वारका’ परत एकदा ‘चंद्रलेखा’ या नाट्यसंस्थेशी सहयोगाने रंगभूमीवर आणले.

१९८३ मध्ये तोंडवलकरांच्या संस्थेच्या सहयोगाने ‘पतिव्रता’ हे नाटक रंगभूमीवर आणले. पौराणिक नाटकांचे हमखास यशस्वी नाटक देणारे आणि आपल्या ट्रीक सीन्सने प्रेक्षकांना अचंबित करणारे हे एक मराठी रंगभूमीवरचे एक वेगळेच व्यक्तिमत्व होते.


Top

प्रभाकर पणशीकर

जन्म : १४/५/१९३४

नाट्यसंपदा या नावाची स्वतःची नाटक कंपनी असणारे वेदशास्त्र संपन्न विष्णुशास्त्री पणशीकरांचे सुपुत्र. त्यामुळे संस्कृत भाषेचे संस्कार बालपणापासूनच घडलेले. पहिल्यापासूनच नाटकाकडे कल. घरच्यांच्या मनाविरुद्ध नाटकातून काम केले. कुणी अरे म्हटल्यास कारे म्हणण्याचा त्यांचा स्वभाव. रंगवावी लागणारी भूमिका रास्त दिसावी याकडे त्यांचा कल त्यामुळे प्रसंगी डोक्याचे केस भादरण्याचे प्रसंग उद्भवत.

‘देवमाणूस’, ‘अंमलदार’, ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘संत तुकाराम’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘इथे गवताला भाले फुटतात’ या नाटकातून प्रमुख भूमिका. अनेक नाटकांना दिग्दर्शन. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा १९८७ मध्ये उत्कृष्ठ अभिनेता म्हणून सन्मान. १९८८ मध्ये पुण्याच्या अॅडव्होकेट नगरकरांच्या नावे दिला जाणारा श्रेष्ठ कलावंत हा पुरस्कार. विष्णुदास भावे यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक १९८८ मध्ये. आज मितीस २००३ सालापर्यंत ‘तो मी नव्हेच’चे यशस्वी प्रयोग चालूच.


Top

यशवंत दत्त

जन्म : ७/११/१९४५

मास्टर छोटू या नावाने गाजलेले जुन्या पिढीतील नट दत्तात्रय महाडिक व वत्सलाबाई यांचे सुपुत्र. १९६९ च्या प्रारंभी ‘अडीच घर वजिराला’ या नाटकातून प्रथमतः पांढरपेशा मुंबईकरांना त्यांचे दर्शन झाले.

८ नोव्हेंबर १९७६ साली मधुसूदन कालेलकरांच्या ‘नाथ हा माझा’ या नाटकाने विशेष प्रसिद्धी. त्यानंतर ‘नटसम्राट’ नाटकाने जनमानसावर अधिराज्य गाजविले. अनेक मराठी चित्रपटांतून भूमिका, ‘गगनभेदी’, ‘वादळ माणसाळतयं’, ‘राजसंन्यास’, ‘सोनचाफा’, ‘कालचक्र’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ या सारख्या नाटकांतूनही संस्मरणीय भूमिका.

चांगला आवाज, चांगली उंची व चांगले व्यक्तिमत्व या दैवी देणग्या असलेला कलावंत.


Top

भाऊराव कोल्हटकर

जन्म : १८६२ मृत्यु : १३/२/१९०१

संगीत रंगभूमीवरील युगपुरुष असे ज्याचे वर्णन केले जाते ते भाऊराव मूळचे बडोद्याचे रहिवासी. त्यांचे वडील हरिदास होते. भाऊराव व त्यांचे थोरले बंधू आप्पाराव कथेमध्ये वडिलांच्या मागे उभे राहून साथ करीत असत. १८८२ साली नाट्य व्यवसायात शिरले तेव्हा ते अवघे वीस वर्षांचे होते. ते अतिशय देखणे होते आणि त्यांचे कंठमाधुर्य लोकोत्तर होते. तारुण्य, सौंदर्य आणि स्वर्गीय आवाज या तीन गोष्टींचा समन्वय एकाच व्यक्तीच्या अंगी सापडणे ही संगीत नाटकाच्या दृष्टीने भाग्याची व अपवादात्मकच घटना म्हणावी लागेल. केवळ भाऊरावांनी ‘शकुंतलेची’ भूमिका करण्याचे ठरविले असता शकुंतलेसाठी नवीन नाट्यपदांची रचना करण्यात आली होती. भाऊरावांचा आवाज अतिशय पहाडी व मधुरही होता. प्रसंगी रसोत्पत्तीच्या दृष्टीने तो नाजूक व लडिवाळ होई तर प्रसंगी कारुण्याच्या छटांनी प्रेक्षकांच्या भावना हलवून सोडी आणि प्रसंगी तो खूप भरदार व चढा होई.

‘सौभद्र’ नाटकात आण्णासाहेब किर्लोस्करांनी भाऊरावांना डोळ्यासमोर ठेऊनच सुभद्रेची पदे रचली. तार सप्तकात षडजाला भिंगरीसारखा फिरत जाऊन मिठी मारणारा भाऊरावांचा आवाज, बडोद्यातील वास्तव्यामुळे अस्सल मराठी लावणीचे सारे मोहक रंग माहिती असलेले भाऊराव. शास्त्रीय संगीताचे मुळात विशेष शिक्षण न घेतलेल्या भाऊरावांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बाळकोबा नाटेकरांच्या सहवासात सबरंगी व सबढंगी गायनाची किमया प्राप्त केली. आणि अल्पावधीत सर्व रसिकांच्या तोंडी ‘भावड्या’ हाच विषय होऊन बसला. ‘रामराज्य वियोग’ नाटकात मंथरेची भूमिका, ‘मूर्च्छकटिक’ नाटकात चारुदत्त तर ‘वीरतनय’ नाटकात शूरसेनेची भूमिका व ‘शारदा’ नाटकातील कोदंड या त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहतात.

Top

नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल

जन्म : १३/११/१८५५ मृत्यू : १४/६/१९१६

रावजी आण्णासाहेब किर्लोस्कर बेळगावच्या शाळेत शिक्षक असताना देवल त्यांचे विद्यार्थी होते. पुढे रंगभूमीवर ते गुरुशिष्यच झाले. नट, नाटककार आणि नाट्य शिक्षक ज्याला पूर्वी तालीम मास्तर म्हणत अशा नात्याने ते रंगभूमीशी संबंधित होते.

नट म्हणून शाकुंतल नाटकात ‘गौतमी’ची भूमिका तर ‘अॅथेल्लो’ नाटकात अॅथेल्लोची भूमिका केली होती.

नाटककार म्हणून त्यांची नाटके ‘दुर्गा’, ‘फाल्गुनराव’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’, ‘शापसंभ्रम’, ‘विक्रमोर्वशीय’, व ‘झुंजारराव’. रंगभूमीवर ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ सारखे सामाजिक प्रश्नावर लिहिलेले नाटक विलक्षण गाजले. त्यांनी एकंदर सात नाटके लिहिली. नाट्यशिक्षक म्हणून (तालीम मास्तर) त्यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पट्टशिष्य नटश्रेष्ठ गणपतराव बोडस हे नाव पुरेसे आहे.

Top

य. ना. तथा आप्पा टिपणीस

जन्म : ३/१२/१८७६ मृत्यु : २५/३/१९४३

जुन्या जमान्यातील गद्य श्रेष्ठ ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’च्या आद्य संस्थापकापैकी ते एक होते. आप्पा हे अत्यंत अभिनय कुशल नट होते. ‘कीचकवध’ नाटकातील कंक, ‘भाऊबंदकी’ नाटकातील राघोबादादा, ‘कांचनगडची मोहना’ नाटकातील प्रतापराव, ‘बायकांचे बंड’ मधील अर्जुन या त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या.

मेरी कॉरेलीच्या ‘थेलमा’ कादंबरीच्या आधारे त्यांनी लिहिलेले त्यांचे पहिले नाटक ‘कमला’ त्यांच्याच ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ने १९११ मध्ये रंगभूमीवर आणले. त्या वेळच्या पौराणिक व ऐतिहासिक नाटकांच्या दिवसात हे सामाजिक नाटक वेगळेपण म्हणून लक्षात राहते. १९१२ मध्ये नाटक कंपनी फुटल्यानंतर ‘भारत नाटक मंडळी’ काढली. या संस्थेतर्फेच त्यांची ‘मत्सगंधा’, ‘राधा माधव’ आणि ‘जरासंध’ ही नाटके रंगभूमीवर आणली.

केशवराव भोसले यांच्या विनंतीवरून आप्पांनी जुन्याच कथानकावरून त्यांना ‘शहाशिवाजी’ नाटक लिहून दिले. ते कमालीचे यशस्वी झाले.<

आप्पांनी आठ गद्य आणि पाच संगीत नाटके लिहिली. ते कुशल दिग्दर्शक होते तसे हरहुन्नरी होते. पाश्चात्य पद्धतीवर ‘मेकअप’साठी ग्रीझ पेंट्स त्यांनीच प्रथम तयार केले. मराठी शाहीच्या वेळचे अंगरखे, सरवारी, पगड्या त्यांनी स्वतः निर्मिल्या होत्या. जिरेटोपासह हुबेहूब शिवाजी त्यांनीच प्रथम उभा केला.

Top

जनुभाऊ निमकर

मृत्यू : ३/११/१९२५

रावजी गोपाल म्हैसकर यांनी निमकर बंधूंच्या सहकार्याने ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ ही नाट्य संस्था १८९४ मध्ये काढली. ही नाटक कंपनी गद्य आणि संगीत दोन्ही नाटके करायची. कंपनीकडे शाकुंतल, सौभद्र, मृच्छकटिक, शापसंभ्रम या जुन्या नाटकांशिवाय गोपीचंद, मुद्रिका, चंद्रहास अशी नाटके ही होती.

१८९७ मध्ये जनुभाऊंनी ‘चंद्रसेना’ हे बाबा डोंगरेंचे नाटक यशस्वी केले. या नाटकापासून ‘स्वदेश हितचिंतक’ नाटक कंपनीची किर्लोस्कर नाटक मंडळीबरोबर चुरस सुरु झाली. कंपनीचा लौकिक वाढला तो ‘शारदा’ नाटकामुळेच आणि तो पण १९०२ पासून केशवराव भोसले शारदा व्हायला लागल्यापासून. कंपनीने संस्कृतमध्ये ‘शाकुंतल’ नाटक बसविले होते. संस्कृत नाटक करणारी ही पहिलीच नाटक कंपनी म्हणावी लागेल.

१९०७ मध्ये कंपनीत मोठी फाटाफूट झाल्यानंतर मामा वरेरकरांचे ‘कुंजबिहारी’ नाटक जनुभाऊंनी घेतले व कमालीचे यशस्वी केले. या नाटकात विष्णुपंत पागनीसांनी गुजराथी पेहरावातील राधेच्या भूमिकेत आणि गुजराथी चालीवरील पदांनी गुजराथी प्रेक्षकांना अक्षरश: वेडे केले.

जनुभाऊ तसे शिकलेले नव्हते तरी गीता, भागवत वगैरे अभ्यासिले होते. नाटक या कालात्मात वस्तूची बूज योग्य तऱ्हेने राखली ती जनुभाऊ निमकरांनी. लहान मोठ्या नटांपैकी प्रत्येकाचे काम रेखीवपणे त्यांनी बसवून दिल्याप्रमाणे झालेच पाहिजे अशी त्यांची शिस्त असे. प्रेक्षकांच्या टाळ्या, हश्या, वन्समोअरला ते कधी बळी पडले नाहीत. नाटकाचे प्रयोग देखील पद्धतशीर बसलेले असत.

वाणी स्पष्ट करण्याकरता जुन्या शास्त्रीय पंडिताप्रमाणे ते नटांना संथा देत असत. प्राँम्टिंग नसे. त्यामुळे प्रत्येक नटाची नक्कल चोख पाठ असे आणि त्यामुळे त्यांचे आपल्या कामात पूर्ण लक्ष असे. संगीताच्या आहारी ते गेले नाहीत व आपल्या नटवर्गालाही त्यांनी जाऊ दिले नाही. आतताईपणा, चीडखोरपणा, हेकटपणा, तेढी दृष्टी यासारखे दोष ही त्यांच्यात होते.

१९१२ मध्ये ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ बंद पडली. ‘शारदा’ व ‘कुंजबिहारी’ या दोन नाटकांनी त्यांनी दीड तपे रंगभूमी गाजवली. केशवराव भोसलेंसारख्या अद्वितीय गायक नट त्यांच्यामुळेच रंगभूमीला मिळाला.


Top

मामा वरेरकर

जन्म : २७/४/१८८३ मृत्यु : २३/९/१९६४

वैद्यकीय शिक्षण सोडून मामा साहित्याच्या प्रेमात पडले. पुढे पोस्टात नोकरीला लागले. नोकरीत असताना त्यांनी नाट्यलेखनाला आरंभ केला. १९०४ साली त्यांनी पहिले नाटक ‘कुंजविहारी’ लिहिले. पण नाटककारला दर्जा नाही म्हणजे तो फारसा शिकलेला नाही आणि पोस्टात कारकून आहे, या कारणाने ते नाटक पसंत पडूनही किर्लोस्कर नाटक मंडळीच्या शंकरराव मुजुमदारांनी ते नाकारले.

पुढे ते ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ने दि. १४/४/१९०८ साली रंगभूमीवर आणले. हे नाटक त्याकाळी अत्यंत लोकप्रिय झाले होते. १९१६ मध्ये ‘संन्यासाचा संसार’ हे नाटक ही रंगभूमीवर आणले. केशवराव भोसलेंच्या निधनानंतर ‘सत्तेचे गुलाम’ नाटकापासून बापूराव पेंढारकरांच्या सहकार्याने मामांनी रंगभूमीवर आणि नाट्यलेखनात बऱ्याच सुधारणा आणि नवीन उपक्रम केले. या सुधारणा आणण्यासाठी त्यांनी टीका सोसली पण नाविन्याची कास सोडली नाही. त्यांनी ३७ नाटके, ६ नाटिका आणि १४ एकांकिका लिहिल्या. सरकारकडून नाट्यविषयक अनेक उपक्रम, योजना त्यांनी सुरु केल्या. ‘पद्मभूषण’ ही पदवी देऊन त्यांचा सत्कार केला.


Top

Have a question or need any help?

Please contact - 020 2448 1614